Prajashilp digital ,
विशेष बातमी
देगलूरः निवडणुकी पूर्व काळात गल्लीबोळात वाढदिवस, डीजेचा दणदणाट, मोठमोठे फ्लेक्स आणि दहीहंडी, भरमसाठ पुरस्कार पण "सत्ता आल्यावर भव्य दहीहंडी अन् नाचाचा कार्यक्रम घेऊ" अशी छातीठोक आश्वासने देणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा खरा चेहरा अखेर समोर आला आहे. सत्ता मिळताच पक्षाला या आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडला असून, यंदाच्या गोपाळकाल्याला नेहमीचा गाजावाजा पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीचे मोठमोठे तमासगीरीणीला आपल्या राजकिय मंचावर नाचविणारे प्रस्थ आता लपुन बसलेत अशी चर्चा गावभर पसरली आहे.
दरम्यान, निवडणुकीत रात्रंदिवस एक करून पक्षाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा पक्षाकडून मोठ्या जल्लोषाची अपेक्षा होती. दहीहंडीच्या थरांसाठी मोठमोठी बक्षिसे आणि सेलिब्रिटींच्या हजेरीत नाचाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे उघडपणे सांगण्यात आले होते. मात्र, सत्ता हाती येताच नेत्यांनी या कार्यक्रमांवर फुली मारली आहे.
देगलूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन एका सांस्कृतिक मेळाव्या प्रमाणे करण्यात येत होते. या प्रसंगी मोठमोठे तमासगीरीण नृतिका आपली नृत्यकला दाखवीत होत्या. यासाठी शहरातील उदगीर रोडवरील स्थित मोठे मैदान नेहमीच ठरलेले होते .हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित करण्यात येत होते.
याशिवाय एक कार्यकर्ताही असे आयोजन दरवर्षी जिल्हा परिषद शाळेत करीत असे पण, ते सध्या सत्ताधारी पक्षातील नगरसेवक प्रतिनिधी असून त्यांनीही त्यावेळेस या कार्यक्रमास फुली मारलेली दिसून येते.
एकूणच शहरातील सांस्कृतिक समाज प्रबोधन आणि युवकांना जमावांना एकत्र आणण्याचे काय कटकारस्थान निवडून आल्यानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे नवीन उत्साही कार्यकर्त्यांची मात्र घोर निराशा झालेली यावेळी आपणास दिसून येते. असे असले तरीही येणाऱ्या काळात गणपती आणि दुर्गा महोत्सव नेहमीप्रमाणे ठरलेले असले तरीही सत्ताधारी पक्षातील नगरसेवक , नगराध्यक्ष आणि पुढारी यांनी मात्र या सोहळ्यास आपण सहभागी होणार नाही कारण आमचे सर्वेसर्वा, दैवत यांचा अपघातात मृत्यू झाला असे कारण देऊन बाजूला होण्याचे ठरवले असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे.
सत्ता नसताना चालत आलेली प्रथा केवळ मते लाटण्यापुरतीच होती का, असा उद्विग्न सवाल आता सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.दरवर्षी हजारो तरुणांना एकत्र आणणारा आणि राजकीय ताकद दाखवणारा हा सण यंदा या पक्षासाठी मात्र निरुत्साही ठरला. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विजयासाठी रस्ता डोक्यावर घेतला होता, त्यांनाच आता हताश होऊन गप्प बसावे लागत आहे.
सत्ता मिळण्याआधी "आमचा उत्सव, आमचा अभिमान" असा जप करणाऱ्या पक्षाला सत्ता आल्यावर मात्र या लोकसंस्कृतीचा आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा विसर पडला आहे, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. नेत्यांचे हे 'गुपचूप' धोरण येणाऱ्या काळात पक्षाला महागात पडणार की कार्यकर्ते हे सहजासहजी विसरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

